तर असा झाला अपघात, दोन जखमी तर दोन जागीच ठार


मुंबई वृत्तसेवा, दिंनाक: 04 सप्टेंबर 2022 : टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीवरील पुलावरील दुभाजकावर कार आदळून हा अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हा अपघात नेमका कसा घडला? याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिली आहे. संबंधित प्रत्यक्षदर्शी अपघातस्थळापासून काही अंतरावर असणाऱ्या एका गॅरेजमध्ये काम करतो. त्याने दिलेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री यांची कार एक महिला चालवत होती. ही कार डाव्या बाजुने अन्य एका कारला ओव्हर टेक करत होती. याचवेळी पुलावर असणाऱ्या दुभाजकाला ही कार धडकली. या घटनेत सायरस मिस्त्री यांच्यासह अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला. चालक महिला जखमी होती, त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. अपघात घडल्यानंतर ५ ते १० मिनिटांनी लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.

पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. अपघातात दोघे जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ही मर्सिडीज कार होती. गाडीचा क्रमांक MH-47-AB-6705 असा आहे.”


 

Leave a Comment