राज्यात निर्बंध मात्र लॉकडाऊनचा विषय अजिबात नाही – राजेश टोपे आरोग्य मंत्री


मुंबई, वृत्तसेवा दिनांक 03 जानेवारी 2022 – महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. आता या प्रश्नावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खुलासा केला आहे.

“लॉकडाऊनचा परिणाम थेट अर्थकारणावर होतो. गरीब माणूस हा हातावर पोट भरतो. त्याच्यावर लॉकडाऊनचा थेट परिणाम होतोे. लोकांनी पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनची झळ सोसली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. पंतप्रधानांनीदेखील जान हैं तो जहान है, असं सांगितलं आहे,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

राजेश टोपे यांनी यावेळी लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं आहे. लॉकडाऊनचा विषय सध्या अजिबात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आरोग्य विभाग टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीत कुठेही लॉकडाऊनची चर्चा नाही. मात्र निर्बंध जरूर वाढविले जातील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, राजेश टोपे यांनी यावेळी निर्बंध लावण्यात येणार असल्याची माहितीही दिली आहे. निर्बंधाच्या बाबतीत नक्कीच कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने काम करत आहोत. तरीही कोरोना नियंत्रणात आला नाही तर रेस्टॉरंट, सिनेमाहॉल, मॉल, शाळा-कॉलेजबाबत निर्णय घ्यावा लागेल, असंही टोपे म्हणाले आहेत.


 

Leave a Comment