“गोध्रा जळीत कांडातील” दोषींना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!


नवी दिल्ली, वृत्तसेवा, दि. १४ ऑगस्ट : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी २००२ मधील गोध्रा जळीतकांडातील दोषींना जामीन देण्यास नकार दिला. अब्दुल रहमान धंतिया, अब्दुल सत्तार इब्राहिम गद्दी आणि शौकत हे तीन दोषी आरोपी या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. ही घटना अत्यंत गंभीर होती. हे कुठल्या एका व्यक्तीच्या मृत्यूचे प्रकरण नाही, असे मत नोंदवत न्यायालयाने दोषींच्या याचिकेवर सुनावणीसाठी खंडपीठ स्थापन करू, असे स्पष्ट केले.

ज्यांनी जळत्या ट्रेनवर पेट्रोल टाकण्यासारखी विशिष्ट भूमिका बजावली होती. आणि ज्यांची मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. त्यांना जामीन दिला जाणार नाही; हे अगोदरच स्पष्ट केले होते, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले. तिघांविरोधात विशिष्ट आरोप असून हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावेळी १२ पैकी ८ दोषींना जामीन दिला होता. एका आरोपींच्या पत्नीला कर्करोग असल्याने न्यायालयाने त्यांच्या अंतरिम जामिनाची मुदत वाढवली होती. २००२ मध्ये गोधरात साबरमती एक्सप्रेस ट्रेनच्या एका डब्ब्याला आग लावून ५९ जणांना जिवंत जाळण्यात आले होते. याप्रकरणात धतिया, गद्दी आणि शौकत यांना दोषी ठरवण्यात आले आहे. दोषींनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर न्यायालय सुनावणी घेत आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें