Byju’s अडीच हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढणार


मुंबई, दिनांक : १३ ऑक्टोंबर २०२२ : भारतातील शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘बायजू’ (Byju’s) येत्या सहा महिन्यात नोकरकपात करणार आहे. मार्च २०२३ पर्यंत तोट्यात असलेल्या कंपनीला नफा कमवून देण्यासाठी जवळपास अडीच हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्यात येणार आहे. मार्केटींग आणि कंपनीचा इतर खर्च कमी करण्यासाठी एकुण ५० हजार कर्मचाऱ्यांपैकी पाच टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. ‘बायजू’च्या सहसंस्थापक दिव्या गोकुलनाथ यांनी ‘पीटीआय’ या वृत्त संस्थेला ही माहिती दिली आहे. “मार्च २०२३ पर्यंत नफा कमावण्यासाठी आम्ही एक योजना आखली आहे.

आम्ही भारतभर ब्रँडबाबत जागरुकता निर्माण केली आहे. येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या भागीदारीतून ब्रँडबाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. भारतातील आणि परदेशातील व्यवसायासाठी १० हजार शिक्षकांची भरती करण्यात येईल”, अशी माहिती गोकुलनाथ यांनी दिली आहे. ‘बायजू’च्या सहाय्यक कंपन्या ‘मेरीटनॅशन’, ‘ट्युटरविस्टा’, ‘स्कॉलर’ आणि ‘हॅशलर्न’ या भारतातील व्यवसायाचाच भाग असतील. तर ‘आकाश’ आणि ‘ग्रेट लर्निंग’ स्वतंत्र संस्था म्हणून कार्यरत राहतील, असे गोकुलनाथ यांनी सांगितले आहे. “या नव्या योजनेमुळे कार्यक्षमता वाढेल आणि अनावश्यक खर्च टाळण्यास मदत होईल. त्यामुळे भूमिकांचेही सुसूत्रीकरण होईल.

आमचे शैक्षणिक मॉडेल ‘बायजू क्लासेस’ आणि अ‍ॅप खूप चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. यासाठी शिक्षक भरती करण्यात येईल. या योजनेमुळे महसुलाचे नियोजन करता येईल”, असे गोकुलनाथ यांनी म्हटले आहे. ‘बायजू’ला ३१ मार्च २०२१ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल ४ हजार ५८८ कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे. हे नुकसान गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ पट जास्त आहे. २०२०-२१ या वर्षात कंपनीचा तोटा २३१.६९ कोटींनी वाढला आहे. तर २०२१ या वर्षातील महसूल २ हजार ५११ कोटींवरून २ हजार ४२८ कोटींवर पोहोचला आहे. दरम्यान, येत्या सहा महिन्यात निम्म्याहून जास्त कर्मचाऱ्यांची भरती भारतात करण्यात येईल. इंग्रजी आणि स्पॅनिश मार्केटसाठी अमेरिका आणि भारतातील शिक्षकांची भरती करण्यात येईल. कंपनीचा व्यवसाय लॅटिन अमेरिकेत वाढवण्याची आगामी काळात योजना आहे, अशी माहिती गोकुलनाथ यांनी दिली आहे.


 

Leave a Comment