एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल

गोंदिया, दि. 15 सप्टेंबर : 9 व 10 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे गोंदिया ग्रामीण भागासह गोंदिया शहरातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांचे नुकसान, शेतीचे नुकसान, आणि गावांचा संपर्क तुटण्याच्या घटना समोर आल्या आहेत. शहरातही वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी तातडीने नियोजन बैठक बोलावून अधिकाऱ्यांना तपासणी आणि आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.

नियोजन बैठकीनंतर, आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया शहरासह विशेषतः तालुक्यातील नदीकाठच्या गावांना आणि इतर गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पाणी घरात शिरलेल्या कुटुंबांना आणि ज्यांची घरे अतिवृष्टीमुळे पडली आहेत, अशा सर्व नागरिकांना त्यांनी तातडीने मदतीचे आश्वासन दिले. याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत व स्थानिक तलाठी, कोतवाल यांच्याशी त्यांनी बैठक घेतली आणि नुकसानग्रस्त लोकांची वैयक्तिक विचारपूस केली.

एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही

आमदार अग्रवाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, “एकही नुकसानग्रस्त शेतकरी किंवा नागरिक नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही.” यासाठी स्थानिक तलाठ्यांना संपूर्ण पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे प्रक्रियेत कोणतीही हयगय होऊ नये, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

खावटी अनुदान आणि पंचनामे

आमदार विनोद अग्रवाल यांनी ज्यांच्या घरात पाणी शिरले अथवा ज्यांची घरे पडली आहेत, अशा नुकसानग्रस्तांना तातडीने १०,००० रुपये खावटी अनुदान देण्याचे आदेश दिले. याशिवाय, पूर्णतः आणि अंशतः नुकसान झालेल्यांची स्वतंत्र याद्या तयार करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात, त्यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. शेतात पाणी शिरले, धाणाचा फुलोरा अवस्थेत असताना पाण्यात बुडाल्याने पिकाचे झालेले नुकसान, धानावर माती आणि गाळ साचल्याने झालेले नुकसान, धान पिक व्यतिरिक्त इतर पिकांचे नुकसान अशा सर्व परिस्थितींमध्ये शेतीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करून गावात प्रसिद्ध करावी, आणि त्यानंतर गाव पातळीवर तपासणी झाल्यावर सदर यादीतील नावे नुकसान भरपाईसाठी पाठविण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या.

आमदार विनोद अग्रवाल यांच्या दौऱ्यात गोंदिया शहरातील सेल्स टॅक्स कॉलनी, सूर्याटोला, बांधतलाव परिसर, रेल्वे तलाव परिसर, अंगूर बगीचा, टीबी टोली, अवंती चौक, तसेच विशेषतः नदीकाठच्या गावांचा आणि इतर गावांचा समावेश होता. या गावांमध्ये नुकसानग्रस्त नागरिकांना भेट देऊन त्यांनी स्थानिक प्रशासन, तलाठी, कोतवाल, कृषी सहाय्यक यांच्याशी चर्चा केली आणि मदत कार्यात गती देण्याचे आदेश दिले. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीवर आमदार विनोद अग्रवाल यांनी तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा दिला आहे.

Leave a Comment

और पढ़ें