ठाकरे सरकारचा नागरिकांना इशारा, …नाहीतर राज्यात पुन्हा नव्याने निर्बंध लावणार



पुणे, वृत्तसेवा, – कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्या घटल्याने राज्यांमधील काही भागात निर्बंध कमी करत दिलासा देण्यात आला आहे. नागपूर, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्य़ांतील सर्व निर्बंध रद्द झाले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना काही ठिकाणी मात्र वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा राज्याने नव्याने निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“रविवारच्या आकडेवारीनुसार रुग्ण बरे होण्याचं प्रमाण कमी आणि रुग्णसंख्यात जास्त झाल्याचं दिसत आहे. आपण सवलत दिल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या धीम्या गतीने वाढत आहे. संख्या जर अजून वाढली तर अनेक निर्बंध नव्याने लावावे लागतील. पुढील आठ दिवसातील परिस्थिती पाहून यासंबंधातील निर्णय घेतला जाईल,” असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

कोरोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण, खाटांची उपलब्धता आणि संसर्गदर या आधारे दर आठवडय़ाला निर्बंध शिथिलीकरणाचे निकष बदलण्यात येतात. सोमवारपासून २० जिल्ह्य़ांमधील निर्बंध पूर्णपणे शिथिल होतील किंवा ते अंशत: शिथिल होतील. मुंबई शहराचा समावेश दुसऱ्या स्तरात झाल्याने निर्बंध कमी होणे अपेक्षित होते, पण गर्दी टाळण्यासाठी तसेच अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई शहराला तिसऱ्या स्तरातच ठेवण्यात आले. परिणामी, गेल्या आठवडय़ाप्रमाणेच मुंबईत निर्बंध कायम राहतील आणि दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच खुली राहतील. पुणे शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने जीवनावश्यक वस्तूंसह अन्य दुकाने आज, सोमवारपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.


 

Leave a Comment