- दोन महिन्यांत तीन वाघ सोडणार
- व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या पोहोचणार १९ वर
गोंदिया, दी. २१ डिसेंबर : जिल्ह्यातील नवेगावबांध – नागझिरा व्याघ्र प्रकल्पात यंदा २० मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील दोन वाघिणींना सोडण्यात आले होते. त्यानंतर या प्रकल्पात पुन्हा तीन वाघ सोडण्यात येणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून हे तीन वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून आणण्यात येणार आहेत. त्यामुळे नवेगावबांध- नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवीन पाहुणे येण्याची चाहूल लागली आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प विकसित करण्यासाठी २० मे २०२३ रोजी गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दोन वाघिणींना सोडण्यात आले. मात्र, या व्याघ्र प्रकल्पात टप्प्याटप्याने पाच वाघ आणण्याची योजना आहे. त्यापैकी पहिल्या टप्यात दोन वाघिणी सोडण्यात आल्या आहेत. आता दुसऱ्या टप्प्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
दुसऱ्या टप्यात या व्याघ्र प्रकल्पात सर्वप्रथम तीन वाघ सोडण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तीन वाघ या प्रकल्पात सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी नवेगावबांध- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची एक चमू नुकतीच ताडोबा येथे जाऊन आली आहे.
