बच्चू कडूंच सूचक वक्तव्य, राज्यात पुन्हा सत्ताबदल होणार का? 


अमरावती, वृतसेवा : दिनांक : १९ मार्च : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा तर शिवसेना शिंदे गटाला 48 जागा असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं. या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया समोर येण्यास सुरुवात झाली आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सूचक विधान केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू? चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे की, चुकून त्यांनी वक्तव्य केलं हे तपासलं पाहिजे. आम्ही शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. युतीचं अजून आमचं काही ठरलं नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची, नाही करायची, किती जागा देणार, नाही देणार त्याचं अजून काही ठरलेलं नाही.

येणाऱ्या काळात त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते. दरम्यान येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत राहणार का याबाबत मिडिया प्रतिनिधींनी विचारले असता त्यांनी सूचक विधान केलं आहे. पुढच्या दीड वर्षात काय होणार हे काही आताच सांगता येणार नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले. तीन वेळा शपथविधी झाले. त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार हे आताच सांगता येत नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा मुख्यमंत्री बदलणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें