गोंदिया जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा : एनसीपी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गोंदिया, दि. २५ जुलै : गोंदिया जिल्ह्यात मागील ५ दिवसांपासून होत असलेल्या सततधार व मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिकांच्या खरीप पिके, घरांची व गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात पडझड झाली असल्याने गोंदिया जिल्ह्यात ओला दुष्काळात जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे. ही मागणी २४ जुलै रोजी गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. 

निवेदना नुसार, गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तलावांसह कृषी वीज पंप व विविध धरणांच्या सिंचन सुविधे अंतर्गत जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धान पिकासह विविध खरीप पिकांची लागवड केली होती. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची खरीपाची धान पेरणी पूर्ण झाली तर काही शेतकऱ्यांची रोवणी येत्या काळात पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. 

दरम्यान, मागील ५ दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले व ओढ्यांना पूर आले आहे. या पुराचे पाणी शेतशिवारात गेल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सलग ५ दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील शेकडो नागरिकांच्या राहत्या घरांची व गोठ्यांची अंशतः तसेच पूर्णतः पडझड झाली आहे.

दरम्यान, शेतकरी शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुढाकार घेत गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत गोंदिया जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली आहे. गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम, जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, बाबा बैस, महिला जिल्हाध्यक्ष मंजू डोंगरवार, जिल्हा महासचिव तीरथ येटरे, बालु वंजारी, शेखर चामट, पिंटू कटरे, प्रकाश बघेले, युसुफ अलिफ सय्यद, निखील चांदेवार, देवानंद ताकडे, अक्की अग्रहरी, रवि मेंढे, विलास वाढई, वैशाली पारधी यांसह बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

पिक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत द्या : मिथुन मेश्राम

खरीप हंगामाच्या सुमारास शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्याने व अन्य कारणांनी बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही. मात्र जिल्ह्यात मागील ५ दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे खरीपातील धान पिकांसह इतर खरीप पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना सरसकट प्रति एकर ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें