सौन्दड गावात राहणाऱ्या भिंगी समाजातील नागरिकांना घरकुल कधी मिळणार?


सौन्दड, ( भामा चुर्हे ) , दिनांक : २३ जुलै : तालुक्यातील सौंदड येथे ४५ वर्षापासून भिंगी या भटक्या समाजाचे ८ कुटुंब वास्तव्यास आहेत. या समाजाची शासन व लोकप्रतिनीधीकडून नेहमी उपेक्षा केली जाते. शासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे या समाजाची लोक आजही उपेक्षित जीवन जगत आहेत. शासकीय योजनेंच्या लाभापासून कोसो दूर असून भिंगी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष पुरविण्याची गरज आहे.

पण हल्लीचे लोकप्रतिनिधी फक्त निवडणूकी पुरता खोटे आश्वासन देऊन त्यांचे मतांचा लाभ घेत असतात. प्रशासनाने ग्रामपंचायत स्तरावर शासकीय योजनांचा लाभ देऊन मुख्य प्रवाहात आणण्याची मागणी भिंगी समाजाकडून केली जात आहे. परंतू आजपावेतो ग्रामस्तरावर ग्रामपंचायत प्रशासनाने साधी दखल घेतली नाही. सौंदड गावात ८-१० वर्षापूर्वी बाहेर गावावरून आलेले किरायादारांना शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे. पण ४५ वर्षापासून वास्तव्यास असलेले भिंगी समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, ही शोकांतिका आहे.

४० वर्षापासून या समाजाची लोक झोपडीवर झिल्ली ( पाॅलिथीन ) टाकून उन्हाळा, पावसाळा काढत आहेत. इतर समाजातील लोकांना घरकुल मंजूर झाले. आणि त्यांचेकडे जागा उपलब्ध नसूनही त्यांना जागा उपलब्ध करून घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला. भिंगी समाजाकडे प्राधान्य कुटुंबाचे राशन कार्ड आहेत. शासकीय अन्न धान्याचा लाभ घेत आहेत. या समाजातील लहान बालके आंगणवाडीत जातात. व मोठे मुलं-मुली ५ ते ८ व्या वर्गापर्यंत शिक्षण घेतात. या समाजातील मुलं-मुली पुरेपूर शिक्षणाचा लाभ घेत नसल्याने आपले सर्वस्व गमावलेल्या समुदायाला समाजात कोणताच सन्मान मिळत नाही.

त्यामुळे या समाजाची उपेक्षाच केली जाते. ईतकेच नव्हे तर या समाजातील नागरिकांच्या विकासासाठी शासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत. सौंदड गावात शासकीय जागा विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे. परंतू भिंगी समाजाचे ४ कुटुंबांना सन २०१९-२० मध्ये घरकुल मंजूर झाले. पण ग्रामपंचायत कडे जागा उपलब्ध नाही, म्हणून प्रस्ताव धुळखात पडले आहे. ज्याठिकाणी झोपड्या बांधत आहेत. ती जागा अंगणवाडीची असल्याचे सांगून ५० मी. पर्यंत कंपाउन्ड वाॅल बनविली गेली आहे. सौंदड बसस्थानक ते रेल्वे स्टेशन मार्गावर पश्चिम दिशेला महावितरण कार्यालयाला लागून झोपड्या असून रोडाच्या समोर पूर्व दिशेला शासकीय जागा असतांनी ती जागा या भटक्या भिंगी समाजाला घरकुल बांधकामासाठी द्यायला पाहिजे होती.

मात्र त्या जागेवर बाहेरून आलेल्या लोकांनी अतिक्रमण केले आहे. सौंदड ग्रामपंचायतने नोव्हेंबर २०२२ मध्ये ग्रांमपंचायतच्या मासिक सभेत त्या खाली जागेवर परमात्मा एक सेवक मंडळ यांचे नांवे ठराव घेऊन ती जागा या मंडळाला देण्यात आली. तसेच ४ नोव्हेंबर २०२२ च्या माहिती अधिकारात माहिती मागितली असता खाली प्लाॅट व ७१ घरकुलांवर सन २०१९ ते २०२२ पर्यंत ग्रामपंचायतच्या मासिक सभेत घरटॅक्स लावण्यात आल्याचे माहिती मिळाली. वास्तविक सन २०१७ ते २०१९ पर्यंत अनेक घर बनून सुद्धा ग्रामपंचायतने घरटॅक्स लावला नाही. हे विशेष. ‌

सन २०१९-२० मध्ये भिंगी समाजाचे ४ कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी ग्रामपंचायतने जागा दिली नाही. हे विशेष. आजघडीला ८ कुटुंबाकडे ५ ते २५ वर्षाचे मुले-मुलीं व २५ ते ७० वर्षाचे वयोवृध्द आहेत. यांना ग्रामपंचायतने साधी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. आजही या समाजाचे लोक उघड्यावर शौचास जातात. या समाजाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्याने अनेक सुविधांचा अभाव आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें