नगराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाची गरज – आ. चंद्रिकापूरे


  • नगरपंचायत कार्यालयात आढावा बैठक…
  • मुख्याधिकारी शिल्पा राणी जाधव यांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

अर्जुनी मोरगाव, दिं. 24 जुन : लोकप्रतिनिधी आणि अधिकारी शासन प्रणालीचे अविभाज्य घटक आहेत. जनतेच्या मूलभूत समस्यांचे निराकरण आणि सर्वांगीण विकासाची जबाबदारी या दोन्ही घटकांवर अवलंबून आहे. विकास रथाची ही दोन्ही चाके एकरूप असावी. नगराच्या विकासाची धुरा विद्यमान नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवर आहे.

स्वच्छ रस्ते, बंद गटारे, स्वच्छ पाणी, शहराचे सौंदर्यीकरण या भौतिक विकासासह शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना सहज, सुलभपणे मिळावा यासाठी प्रयत्न करावे. अर्जुनी नगरपंचायत विकासाच्या दृष्टीने खूप मागे आहेत. जनतेने ज्या अपेक्षेने तरुण उत्साही नगरसेवकांना निवडून दिले त्यांच्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात समन्वयाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.

ते अर्जुनी नगरपंचायत येथील सभागृहात आयोजित नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामांच्या आढावा बैठकीचे अध्यक्ष म्हणून संबोधन करीत होते. यावेळी नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, उपाध्यक्ष ललिता टेंभर, बांधकाम सभापती सागर आरेकर, मुख्याधिकारी प्रणय तांबे आणि नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. आ. चंद्रिकापुरे यांनी नगरपंचायत क्षेत्रांतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शहरातील वनहक्काचे अतिक्रमणे नियमानुकूल करणे, विविध समाजांच्या सार्वजनिक भूखंडावरील विकास कामे आणि अडचणी आणि विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणांच्या समस्येवर आढावा घेतला.

मागील दहा दिवसापासून अर्जुनी येथील पाणीपुरवठा विद्युत बिल न भरल्याने महावितरणने खंडित केला. या विभागाचे अभियंता बेलपत्रे यांच्याशी चर्चा करण्यात आली. सदर योजना नगरपंचायत ला हस्तांतरित न झाल्याने थकित बिलापैकी नगरपंचायतचा नेमका हिस्सा किती? हा संभ्रम निकाली काढण्यासंदर्भात चर्चा झाली. नगरपंचायतने बिल भरला नाही म्हणून पाणीपुरवठा बंद असल्याचा गैरसमज निर्माण झाला होता. विद्युत बिलाचा भरणा जिल्हा परिषद करीत असते.

जिल्हा परिषदेला येणारा निधी शासनाने बंद केल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे निष्पन्न झाले. जनतेच्या मनातील गैरसमज दूर करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तोडगा काढण्याचे आमदारांनी निर्देश दिले. प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजना अंतर्गत आढावा दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांनी अनियमितता केल्याचे आढळून आले. या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे देयके देण्यास अभियंता दीपक डोंगरवार यांनी विलंब लावल्याने लाभार्थी अडचणीत सापडले या कामचुकार अभियंत्याला निलंबित करण्याच्या सूचना केल्या. शहरात 585 अतिक्रमणधारक आहेत. या अतिक्रमण धारकांचे प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाकडे पाठवा. अतिक्रमण नियमानुकूल करण्याची कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश दिले. संविधान चौक, बिरसा मुंडा चौक, आदिवासी गोवारी चौक आणि हनुमान सेवा समिती यांचे सार्वजनिक दावे तयार करून विकास कामात येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्याविषयी सूचना केल्या.

शहरात प्रमुख रस्त्यावर प्रवेशद्वार, शहरातील तलावांचे रस्त्यांचे रुंदीकरण आणि सौंदर्यीकरण, अनधिकृत अतिक्रमणे काढून सहर टुमदार करण्याचे आवाहन अधिकारी आणि नगरसेवकांना केले. या विकास कामांना आमदार म्हणून प्राधान्याने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

अधिकाऱ्यांच्या संथगती कार्यप्रणालीवर आमदार भडकले
जिल्ह्यातील इतर नगरपंचायतींच्या तुलनेत अर्जुनी नगरपंचायत विकास कामांमध्ये मागासली आहे. अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा, कर्तव्या प्रतीची उदासीनता, अज्ञानता याचा फटका विकास कामांना बसला. मुख्याधिकारी शिल्पा राणी जाधव यांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. अतिक्रमण धारक आणि घरकुल योजनेतील कासवगती या विषयावरून आमदार अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले.


 

Leave a Comment

और पढ़ें