सडक/अर्जुनी, गोंदिया, दिंनाक : 18 ऑगस्ट : 2022 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त एरीया 51 कोहमारा आमदार जनसंपर्क कार्यालय येथे आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. देशाची अतिशय महत्वपूर्ण राज्यघटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली. या घटनेने संपूर्ण देश एकसंघ बांधला गेला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तयार केलेल्या या घटनेवर महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यामुळे या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी या महापुरुषांचे विचार अतिशय महत्वपूर्ण आहे. या घटनेची पायमल्ली होता कामा नये त्यासाठी आपली राज्यघटना शाबूत ठेवण्याची जबाबदारी देशातील प्रत्येक नागरिकाची आहे असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
देशाच्या स्वातंत्र्याला आज ७५ वर्ष पूर्ण होत असून अनेक वीरांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याची जपवणूक करण्याची आपल्याला आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, भगतसिंग, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक क्रांतीकारकांचे अतिशय महत्वपूर्ण योगदान आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल यांनी देशाची सूत्र आपल्या हाती घेऊन पंचवार्षिक योजनेची घोषणा केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीचे पाऊल पडले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने संशोधन शेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली. अंतराळ क्षेत्रात विविध मोहिमा यशस्वी केल्या. तसेच विविध क्षेत्रात प्रगती साधली. त्यामुळे आपला देश हा विकासाच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यावर पोहचला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांच्यासह अनेक नेत्यांचे देशाच्या विकासात अतिशय महत्वाचे योगदान दिले. मात्र काही लोकांकडून हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे.
देशाचा पोशिंदा असलेला देशातील सर्व शेतकरी वर्ग आज अडचणीत आला आहे. राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठ संकट कोसळले असून या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉ. अविनाश काशीवार, नगरपंचायत अध्यक्ष तेजराम मडावी, प.स. सदस्य डॉ. रुखीराम वाढई, प.स. सदस्य शिवाजी गहाणे, नगरपंचायत उपाध्यक्ष वंदनाताई डोंगरवार, सभापती महेंद्र वंजारी, सभापती कामिनीताई कोवे, महीला तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रजनीताई गिरेपुंजे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चु-हे, नगरसेविका शशिकलाताई टेंभुर्ण, दीक्षाताई भगत, शाहिस्ता शेख, नगरसेवक आनंद अग्रवाल, प्रा. मंजुषा चंद्रिकापुरे, उमराव मांढरे, सुखदेव कोरे, मुन्ना देशपांडे,आशिष येरने, फारुख शेख, संजय शहारे,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.